अंक पाचवा - प्रवेश चवथा

Parent Category: मराठी पुस्तके Category: एकच प्याला (नाटक) - मराठी

--------------------------------------
संदर्भ आणि अनुक्रमणिका
--------------------------------------

(स्थळ- सुधाकराचे घर. पात्रे- आसन्नमरण सिंधू; जवळ सुधाकर, पद्माकर, रामलाल आणि फौजदार)

पद्माकर : दादासाहेब, हे पाहा मेलेलं मूल; हे या हरामखोरानं ठार मारलं! ही पाहा माझी ताई! या दीनदुबळया देहाची या दारूबाज दुष्टानंच प्राणांतिक दुर्दशा केली आहे! असाच पकडा या नराधमाला-

फौजदार : भाऊसाहेब, असं रागावून काय होणार? थांबा, आपण बाईंना नीट विचारून पंचनामा करू.

पद्माकर : ताई, ताई, सिंधूताई-

रामलाल : भाऊ, थांब जरा; असा हातघाईवर येऊ नकोस! तिला जरा ग्लानी आली आहे!

पद्माकर : ही ग्लानी- ही ताई- हे सारं सारं- या दारूडया राक्षसाचं अघोर कर्म आहे! दादासाहेब, काय वाटेल ते करा, पण या काळतोंडयाला- ताईच्या पंचप्राणांवर दरोडा घालणार्‍या या दारूडयाला काही तरी भयंकर शिक्षा भोगायला लावा!

रामलाल : भाऊ, व्हायचं ते झालं; आता यांच्यावर राग धरून झाली गोष्ट पुन्हा येणार आहे का?

पद्माकर : भाई, माझं सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नकोस! या चांडाळानं माझी सोन्यासारखी ताई अन्नावाचून झिजवून झिजवून मारली- काठया दगडांनी ठेचून मारली- कोळयामाळयांच्या तोंडी येणार नाहीत अशा शब्दांनी या मात्रागमनी नीचानं तिच्या काळजाला घरे पाडून मारली! दादासाहेब, तुमच्या पाया पडतो, काही झालं तरी याला मोकळा सोडू नका हो! बुध्दिपुरस्सर गुन्हा केला म्हणून तुरुंगात नेऊन घाला किंवा दारूनं माथं फिरलं आहे म्हणून वेडयाच्या दवाखान्यात नेऊन लोटा; अक्कलवान गुन्हेगार म्हणा, किंवा निर्बुध्द पशू म्हणा, पण याला कुठल्या तरी कोंडवाडयात घाला! याच्या मोहाला गुंतूनच- माझी ताई म्हणजे देवी आहे हो- नवरा म्हणून ठरलेल्या या जनावराच्या नावाची पंचप्राणांच्या पुष्पांनी पूजा करण्यासाठी ही इथं गुंतून राहिली आहे. देवमूर्ती म्हणून मानिलेला हा दगड एखाद्या नरककुंडात रिचवून हिच्या नजरेआड केला म्हणजे हिला घरी नेऊन हिच्या औषधपाण्याची तरी व्यवस्था करता येईल हो!

फौजदार : भाऊसाहेब, जरा शांत व्हा. आपण असे बोलू लागला-

पद्माकर : दादासाहेब, माफ करा. दगडाचा पुतळा असतो तरीसुध्दा सव्वा हात जीभ बाहेर काढून बोलायला लागलो असतो! मग आता तर चांगला रक्तामांसाचा- हिच्याच रक्तामांसाचा- तिचाच भाऊ आहे- काय सांगू हो, बोट करून दाखवायला तिच्या अंगावर रक्तमांससुध्दा राहिलं नाही,- तेसुध्दा या राक्षसानं गिळून टाकलं- दारूच्या घोटाबरोबर हिच्या रक्ताचा घोट घेऊन जित्या अंगातील मांसाचे लचके तोडून या पिशाच्चानं आहारून टाकले. चार गिरण्यांच्या मालकाची ही मुलगी, या शिकलेल्या दारूबाजानं आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता तिला जात्यावर दळायला लावलं. आमच्या घरी कुत्र्यांच्या पिलांना जे दूध मिळतं- मिळतं कसलं, त्यांना पाजताना हलगर्जीनं खाली सांडतं तितकंसुध्दा या गोजिरवाण्या बाळाला कधी लाभलं नाही! आमच्या घरी मोलकरणीनं उष्टंखरकटं टाकलं असेल, तितकं अन्न कधी हिला मिळालं नाही! याच्याकडे पाहिलं म्हणजे दयामाया पार जळून जातात! दगड असतो तर मनुष्य झालो असतो, आणि मनुष्य आहे, तरी दगड झालो आहे. याच्या गळयाला फास घालताना, ताईच्या गळयातील मंगळसूत्र तुटलं तरी चालेल! ताई, सिंधूताई, ऊठ बरं, बाळ! (तिला किंचित उठवून बसवतो.)

सिंधू : दादा, केव्हा आलास तू? भाई, तूही आलास? तिकडे कुणीकडे असायचं? दादा, ऊठ बरं, चुलीवर थोडा भात आहे; दोन तांबे अंगावर घालून चार घास खायला घाल! तिकडे कालपासून पोटात काही नाही!

पद्माकर : याच्या तोंडात चार घास घालण्यापेक्षा याच्या पिंडब्रह्मांडाचा एकच घास करून काळाच्या पोटात कोंबण्यासाठी मी आलो आहे! ताई, हे पाहा फौजदारसाहेब तुझा जबाब घेण्यासाठी आलेले आहेत. या खुनी दारूबाजानं काय काय केलं ते सगळं यांना नीटपणे सांग! दादासाहेब, विचारा तिला काय विचारायचं ते-

फौजदार : बाई, यांनी काय काय केलं ते सांगा बरं!

सिंधू : यांनी काही केलं नाही- कुणी सांगितलं आपल्याला हे?

फौजदार : मग मुलाला काय झालं? तुम्हाला हे कपाळावर लागलं कसं?

सिंधू : मी दोन दिवसांची उपाशी होते. मला राहूनराहून भोवळ येत होती. मुलाला घेऊन माळयावरून उतरताना मला घेरी आली; पडल्यामुळं मला कपाळावर खोक पडली! मूल माझ्या अंगाखाली चेंगरलं! इकडचा काही संबंध नाही त्यात!

पद्माकर : ताई, अगदी खोटं सांगितलंस! मग या काठीला रक्त कसं लागलं?

सिंधू : काठी टेकीत रक्तभरल्या हाती मी इथपर्यंत आले. तिकडचा काही संबंध नाही त्यात!

फौजदार : बाई, हे सारं खरं आहे का?

सिंधू : खरं- अगदी खरं आहे! माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा!

पद्माकर : नाही हो; दादासाहेब, उघड उघड हे खोटं आहे! ताई, तुला माझी, बाबांची, तुझ्या नवर्‍याची शपथ आहे. खरं सांग.

सिंधू : दादा, असा का अंत पाहतोस? मी सांगितलं ते खरं आहे अगदी!

पद्माकर : दादासाहेब, हे खोटं आहे हो! काय करावं आता?

फौजदार : भाऊसाहेब, काही करता येणार नाही आता! आपला राग कितीही अनावर झाला, तरी यांच्या पुण्याईपुढं तुमचं-आमचं काय चालणार? न्यायाचं शस्त्र कितीही तीक्ष्ण असलं तरी अशा पवित्र पतिव्रतेच्या पुण्याईची ढाल आड आल्यावर ते काय करणार?

पद्माकर : दादासाहेब! हिच्या खोटया बोलण्यामुळं या हरामखोराला मोकळा सोडता काय?

फौजदार : भाऊसाहेब, प्रत्यक्ष गंगाप्रवाहात पोहणारावर उगीच आग पाखडून काय होणार!

रामलाल : शाबास, सिंधूताई, शाबास! भाऊसाहेब, देवब्राह्मणांच्या सत्यतेपेक्षाही अशा पुण्यरूप सतीच्या असत्यालाच परमेश्वराच्या आशीर्वादाचं अधिक बळ असतं! भाऊ, जाऊ देत! झालं ते झालं! सिंधूताई, तू मात्र धन्य आहेस! तुझ्यासारख्या आर्या अजून आहेत, म्हणूनच या पुण्यभूमीला आर्यावर्त नाव शोभतं! भारतवर्ष साध्वीसतीचं माहेरघर आहे! सरकारनं सतीचा कायदा करून आमच्या साध्वींना सहगमनानं देह जाळून घेण्याची बंदी केली तर जितेपणीत आतल्या आत जळून नवर्‍याच्या नावासाठी या मंगलदेवता आत्मयज्ञ करीत आहेत! भाऊसाहेब, सिंधूताईच्या इच्छेसाठी तरी सुधाकरावरचा राग सोडून द्या!

सिंधू : दादा, इकडे ये, माझ्या शेजारी बैस असा! दादा, आपल्या माणसावर असा राग करून चालेल का? माझी जातीघडी सरत आली! बाबांच्याखेरीज आणि तुम्हा दोघांखेरीज तिकडे आपलं म्हणायला कोणी आहे का आता? असं रत्न मी मागे टाकून जाते, ती तुझ्या धीरावर ना? तूच आता त्यांच्या उन्हात तापल्या जिवावर पदर घालायला नको का? तुझ्या ताईचं सौभाग्य तूच आता जपून ठेवलं पाहिजेस. लहानपणी माझ्या कुंकवाला तजेला यावा म्हणून तू माझ्या करंडयात मृगाची इवलाली पाखरं आणून ठेवीत होतास, आठवतं का? मग आताच ती माया कुठे गेली? माझ्या सौभाग्याचं कुंकू तुझ्याच ठेवणीला देऊन मी जात आहे!

पद्माकर : छाकटया सैताना, ऐक, ऐक माझ्या लाडक्या ताईचा एक एक बोल! पण तुझे डोळे कुठले उघडायला? ताई, ताई, काय म्हणतेस हे तू?

रामलाल : भाऊ, फौजदारसाहेबांना जायला वेळ होत नाही का?

फौजदार : चला, भाऊसाहेब- पण केव्हा तरी तेवढी फिर्याद काढून घ्या म्हणजे झालं!

(फोजदारांना पोहोचविण्यासाठी रामलाल व पद्माकर जातात.)

सुधाकर : (स्वगत) उघडले, भाऊसाहेब, माझे डोळे साफ उघडले! मात्र माझे डोळे असे उघडले आहेत तोवर या देवतेच्या जात्या जीवज्योतीच्या प्रकाशात या क्षणीच स्वर्गाचा रस्ता एकदा नीट पाहून ठेवतो म्हणजे मग भोवती काळाकुट्ट अंधार पडला आणि माझे डोळे कायमचे मिटले तरी दिशाभूल होण्याची भीतीच नको. (इकडे तिकडे पाहून व औषध उघडून) हं, हेच ते विषारी औषध! कुठं आहे ती जिवाला जाऊन भिडलेली साता जन्मांची वैरीण? (एका पेल्यात दारू व विष ओततो.)

सिंधू : ऐकलं का? जरा माझ्याजवळ यायचं होतं-

सुधाकर : तुझ्याजवळ येऊ? (तिच्याजवळ बसून) काय काम आहे?

सिंधू : माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवावं! आपला हात माझ्या हातात द्यावा-

सुधाकर : (तसे करून) सिंधू, सिंधू, देवतास्वरूप सिंधू! काय तुझी दुर्दशा झाली ही! सिंधू, या दारूबाज नवर्‍याच्या पायी तू बुडालीस! अपशब्दांनी तुझा अपमान केला! कधी तुला गोळाभर अन्न मिळालं नाही! पोटासाठी तुला दळायला लावलं! तुझे हालहाल केले! तुझ्या पोटचा गोळा तुझ्या डोळयांदेखत चेचून टाकला! देवी, संसाराच्या वनवासात फाटकं धोतर आड करून तुला वणवणायला लावलं! सिंधू, सिंधू, उदारहृदये सिंधू, शापाच्या एका शब्दानं मला जिता जाळून टाक! पदरीचं पुण्य खर्चून, खोटं बोलून या सुधाकराला कशाला वाचवीत बसलीस? तुझ्या पुण्याईनं स्वर्गाचा संसार सजवून साजरा करण्याची तुझी योग्यता; चौर्‍याऐंशी लक्ष जन्माची संचितं या जन्मी उभी राहिली आणि विधात्यानं 'सुधाकर' हे दारूनं ओथंबलेलं नाव तुझ्या फाटक्या कपाळी कोरलं! सिंधू, देवी, मला क्षमा कर! या अनंत अपराधी पातक्याला क्षमा कर!

सिंधू : आपण असा जिवाला त्रास का बरं करून घ्यायचा? मी फुटक्या कपाळाची का म्हणून? भरल्या हाती हळदीकुंकवानं, आपल्या मांडीवर मला मरणं आलं, याहून आणखी कोणतं भाग्य हवं मला? माझं मंगल झालं! आपण मनाला त्रास करून घेऊ नये. माझ्या गळयाची शपथ आहे! आधीच प्रकृती अशी झालेली! उन्हाच्या वेळी संतापानं डोकं तापलं तर सुंठ उगाळून द्यायलासुध्दा कोणी नाही. आणखी माझं अखेरचं हात जोडून सांगणं आहे. आता आपल्या जिवाला जपणारं कुणी नाही. लोकं सारी ज्याची त्याला असतात. माझ्या कपाळी आपली सेवा एवढीच लिहिली होती,- आपण आता एकटे राहिला- आता पुढं तरी माझ्या रक्ताची शपथ आहे- आपण यापुढं कधी घेऊ नये! ऐकायचं ना माझं एवढं! एका थेंबालासुध्दा शिवायचं नाही-

सुधाकर : नाही, सिंधू, उभा जन्म तुझी पवित्र आज्ञा मोडण्यात घालविला! तुझी शेवटची आज्ञा तरी पाळण्याइतका हा पातकी सुधाकर भाग्यशाली नाही! हा शेवटचा एकच प्याला मला अजून घ्यायचा आहे. नको, दुर्दैवी जीवा, आता माझ्याकडे पाहू नकोस! या थिजत चाललेल्या डोळयांत अनाथ आशा अजून कशाला तळावते आहे. सिंधू, सिंधू, काय- रामलाल, धाव-

सिंधू : नाथ, जिवाला सांभाळा- सुधाकर! माझ्या सुधाकरांना, देवा- (सिंधू मरते. रामलाल येतो. सुधाकर पेला घेतो व उठून उभा राहतो. रामलाल सुधाकराच्या हातून पेला घ्यावयाला जातो, तोच तो झटकन विष पितो.)

सुधाकर : चांडाळा, ऐन वेळी असा घात करू नकोस!

रामलाल : सुधा, काय प्यालास हे?

सुधाकर : दारू! एकच प्याला!

रामलाल : अजून दारू! जिनं एवढा अनर्थ केला तीच दारू?

सुधाकर : होय, रामलाल, तीच दारू! जिनं माझ्या घरात एवढा अनर्थ केला तीच दारू! जिनं चारी खंडांत अनर्थांचं साम्राज्य चालविलं आहे ती दारू! कुबेराला भीक मागायला लावते ती दारू! भीमासारख्या वज्रदेही शरीराला बहात्तर रोगांचा दवाखाना बनविते ती दारू! शिकलेल्या शहाण्याच्या थोबाडाला शिमग्यातल्या शिव्याशेणांनी शोभा आणते ती दारू! महापतिव्रतांना नवर्‍याच्या हातानं बाजारात आणून बसवते ती दारू! जिवलग नात्याचे धागे कुजवून तडातड तोडते ती दारू! बापाला मुलाकडून, मुलाला बापाकडून ठार मारविते ती दारू! डुकराचं नावसुध्दा न घेणार्‍या पाक मुसलमानाला डुकरासारखं खातेर्‍यात लोळविते ती दारू! गायत्रीमंत्रानं पवित्र झालेल्या ब्राह्मणांच्या जिभेला गायत्रीच्या मांसाची चटक लावते ती दारू! एखाद्या पशूप्रमाणं पुत्राला मात्रागमन्याप्रमाणं प्रत्यक्ष जन्मस्थानी- अरेरे! बोलू नये ते बोलणं आलं! पण सुधाकराच्या ज्या जिभेनं दारूचा विटाळ मानला नाही, त्या जिभेला एक किळसवाण्या शब्दानं काय वाट लागणार! आणि समाजात ठिकठिकाणी शिकलेल्या संभावित गळयांतून जी दारूची गटारं वाहताहेत त्यात एका शब्दाची घाण वाहून जायला किती वेळ लागणार!- रामलाल, कान फोडून स्पष्ट ऐक- पुत्राला मात्रागमन्याप्रमाणं प्रत्यक्ष जन्मस्थानी लघुशंका करायला लावते ती दारू!- ती दारू मी प्यावी अं! आता तोंड वाईट करू नकोस! रागावू नकोस- तुला एकदा सांगितलं, आज शेवटचं सांगून ठेवतो, की दारूची सवय सुटण्याचा काळ ती लागण्यापूर्वी काय तो असतो! पहिला एकच प्याला घेण्यापूर्वी भावी मद्यप्याचा हात धरला तरच फायदा होईल! ज्यानं एकदा पहिला एकच प्याला घेतला त्याला हा शेवटचा असा एकच प्याला घ्यावाच लागतो! दारूबाज दारूतच मरायचा, हे ब्रह्मवाक्यच आहे! आणि माझ्यासारख्या एखाद्याला पश्चात्ताप झाला तरी हा एकच प्याला काही टळत नाही! मात्र जळफळीत औषधाला मारण्यासाठी त्यात जसं पुष्कळसं पाणी ओतावं लागतं, त्याप्रमाणं हा अखेरचा एकच प्याला घेताना, त्यातली दारूची जलाल आग मारण्यासाठी त्यात रसकापरासारखं एखादं विष बरंच घालावं लागतं!

रामलाल : काय? यात रसकापूर? आत्यंतिक घातक रसकापूर घातला आहेस? भयंकर विष प्यालास?

सुधाकर : विष पिऊ नको तर काय करू? ही पाहा- ही देवता मला सोडून गेल्यावर जगात माझं काय राहिलं आहे?

रामलाल : काय, ताई गेली? (सिंधूजवळ जाऊन बसतो.)

सुधाकर : हो, रामलाल, ती गेली! माझी सिंधू गेली! माझी पुण्याईची सिंधू आटली! माझी दयेची सिंधू, करुणरसाची सिंधू, काळ-सागराला मिळाली- नाही, या पातकी सुधाकरानं निर्मिलेल्या दारूच्या समुद्राला मिळाली. या सुधाकराचं जग दारूच्या एकच प्याल्यात बुडून गेलं!

(राग- भैरवी; ताल- दादरा. चाल- पिया सोने दे.)

त्यजी देवा हतदैवा।
जगी राही काय॥ ध्रु.॥

सिंधू सुखाचा।
पुण्यांशाचा।
सकळ आटे तापे मम।
विशाल जरी हाय॥ 1॥

वामनअवतारी देवाला त्रिभुवनाचं माप घेण्यासाठी अवाढव्य त्रिविक्रमरूपानं तीन पावलं टाकावी लागली, पण या सुधाकराचं उभं त्रिभूवन या देवीच्या दोन पावलांपुरतंच होतं! त्याच पायांवर मस्तक ठेवलं असता मला मरण यायला पाहिजे. या देवतेचे पाय धरून असा हिच्याबरोबर मी गेलो तरच हिच्या पुण्यबलानं माझी पातकं जळून मला स्वर्गद्वारात प्रवेश करता येईल! गेली! दिव्यतपस्विनी मंगलनिधान पूण्यमूर्ती सिंधू गेली! रामलाल, तुझी ताई गेली आणि माझी मानलेली आई गेली!

रामलाल, रामलाल, हा सारा अनर्थपात होण्याचं कारण मी पहिल्यानं घेतलेला दारूचा एकच प्याला! त्या दिवशी केलेल्या पातकानं भ्रष्ट झालेलं तोंड या देवीच्या रक्तानं- या मूर्तिमंत अमृतानं धुऊन टाकतो. (तिच्या रक्ताचे चुंबन घेतो.) म्हणजे माझा पवित्र देह स्वर्गाला पात्र होईल! रामलाल, असा भेदरून जाऊ नकोस, हा घे तो एकच प्याला! हा एकच प्याला नीट चव्हाटयावर मांडून सार्‍या जगाला दाखीव आणि आल्यागेल्याला, शिकलेल्याला- अडाण्याला, राजाला-रंकाला, ब्राह्मणाला-महाराजाला-म्हातार्‍याला आणि मुलाला, तुझ्या जिवाभावाच्या दोस्ताला आणि सात जन्मांच्या दुश्मनाला, हात जोडून कळकळीनं सांग, की सार्‍या अनर्थाचं कारण हा दारूचा पहिला एकच प्याला असतो! त्याच्यापासून दूर राहा! जो जो भेटेल त्याला त्याला सांग- सिंधूच्या पवित्र रक्तानं तोंड धुऊन मी सांगतो आहे- मला मोठयानं ओरडवत नाही- तू मुक्तकंठानं प्रत्येकाला सांग, की काय वाटेल ते पातक कर- पण दारू पिऊ नकोस! (सिंधूच्या पायावर डोके ठेवून मरतो.)

रामलाल : अरेरे, काय हा अनर्थ! एकदम तीन जिवांच्या तीन परी झाल्या! मूल गेलं, सिंधू गेली, सुधाकर गेला! घर बुडालं आणि वंश बुडाला! या जगात सुधाकराचं आता काय राहिलं आहे? सर्वस्वासह हे तीन जीव ज्याच्यात बुडाले तो तेवढा दारूचा हा एकच प्याला!!

ब्रह्मार्पण ब्रह्महविर्ब्रह्माग्ना ब्रह्मणा हुतम्। ब्रह्मैव तैन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना॥

- श्रीगीतोपनिषत्सु श्रीभगवान्

--------------------------------------
संदर्भ आणि अनुक्रमणिका
--------------------------------------

Hits: 285
X

Right Click

No right click