उपोद्धात - १०

Parent Category: मराठी पुस्तके Category: मराठे व इंग्रज - न. चिं. केळकर

मराठी राज्यांत वारंवार दंगे व क्रांति होण्याचें आणखी एक कारण असें होतं की, त्य़ा राज्यांत राजकीय संबंधीच्या मिळकतीवर-मग ती मिळकत एखाद्या पाटलाची असो, वा सरदारांची जहागीर असो-कोणाचा वारसा चालावा हें ठरलेले नव्हतें! फार काय सांगावे, पण खुद्द छत्रपतींचे सिंहासनसुद्धां या अशाश्वतांच्या संकटांतून मुक्त नव्हतें. भावाभावांत ज्याच्या मनगटाचा जोर चालेल त्यानें वडिलोर्जित उत्पन्न खावे अगर अधिकार भोगावा अशी त्या वेळची वहिवाट होती. सरकारांतून योग्य माणसाची निवड प्रथम होई; परंतु जर मागून त्या माणसाच्या भावाने ' मी आधिक नजराणा देतों, मलाच तो अधिकार द्या, असें म्हटलें तर कायद्यावर नजर देऊन सरकार त्याचेंहि म्हणणे कबूल करायाला कचरत नसे. शाहू व ताराबाईचा पुत्र शिवाजी यांत राज्याचा योग्य वारस कोण याबद्दल हल्ली आम्ही वाटेल तितका वाद करूं, पण त्या काळची माणसें असली चर्चा कधींच करीत नव्हती. ती म्हणत की, ताराऊचा मुलगा शिवाजी हा जसा थोरल्या शिवाजीचा! नातू, तसाब शाहू देखील थोरल्या शिवाजीचा नातूच आहे. दोघेहि योग्य वारस आहेत. ज्याची सरशी होईल त्याला आम्ही मुजरा करूं. पेशव्यांच्या घरांत नानासाहेब व भाऊसाहेब यांमध्ये वांकडें आलें तेव्हां कोल्हापूरच्या संभाजीने भाऊसाहेबांस पेशवाईचा वस्त्रे दिली. ती वस्त्रे देण्याचा संभाजीला आणि घेण्याचा भाऊसाहेबाला वाजवी हक्क नव्हता असें कोणीच मानले नाही. भाऊसाहेबाच्या वतनाला आम्ही ' पेशवाईविरुद्ध बंड' असें नांव ठेवून तो भयंकर गुन्हा समजू; पण तसें त्या वेळी खुद्द नानासाहेब पेशव्यांनासुद्धा वाटलें नाही. सरदारीबद्दल भांडण लागलें म्हणजे लोक एवढेंच पहात की, बादीप्रतिवादी हे मूळ संपादकाचे योग्य वारस आहेत की नाहीत ते तसे असल्यास मग त्यांच्या भांडणांत कांही फायदा दिसल्याशिवाय आपणास पडण्याचे कारण नाही अशीच लोकांची समजूत होती. गायकवाडांच्या घरांत भांडण लागलें व तें सरकारांत आलें म्हणून फत्तेसिंग व गोविंदराव यांस एकमेकांवर चढ करून नजराणा भरावा लागला. भोसल्यांच्या घरांत भांडणे लागली ती त्यांनी सरकारांत आणली नाहीत म्हणून सरकारनें त्यांत लक्ष्यही घातलें नाहो. सरकारचें म्हणणें की, भांडणारे चौघे भाऊ राणाजीचे पुत्र असल्यामुळें सर्वाचा हक सरदारांवर आहेच. तंट्याच! निकाल होऊन जो शेवटी सर्वमान्य ठरेल त्यालाच आम्ही सरदारावी वस्त्रे देऊं म्हणजे झाले. सवाई माधवराव व राघोबादादा यांत भांडण लागले असतां गायकवाड व भोसले वगैरे पेशवाईंबाहेरचे सरदार त्या भांडणांत पडले नाहींत याचें कारण हेंच होय.

जातिद्वेषामुळें राज्य गेले असे जे म्हणतात ते कोणाच्या जातिद्वेषामुळे कोणाचे राजकारण विघडलें हे कांहीच सांगूं शकत नाहीत. मराठ्यांच्या राज्यकारभारांत भिन्न जातींच्य़ा लोकांचे संबंध नेहेमी एकत्र येत द्वोते. त्या अर्थी खरें पाहिले तर या जात्यभिमानाचा परिणाम राजकारणावर नेहमी होत असला पाहिजे; पण तसा तो झाल्याचें इतिहासांत कोठेंहि नमूद नाही. यावरून राज्यनाशाशी जातिभेदाचा कांहीएक संबंध नाही, व तो केव्हांही राजकारणाच्पा आड येत नाही, असें सिद्ध होते. फार
झालें तर इतिहासांतल्या एकदोन गोष्टींचा जातिभेदाशी संबंध जोडतां येईल, पैकी पहिलीतला पुरावा ऐकीव माहितीचा व संशयग्रस्त आहे. ती गोष्ट नारायणराव पेशव्यांच्या खुनासंबंधाची होय. नारायणरावानें प्रभूंचा छळ केला म्हणून त्यांस प्रभूंनी गारद्याकडून मारविले असें कांही जुन्या प्रभू मित्रांच्या तोंडून मी ऐकले आहे.

पण या गोष्टीला सदरहू मित्रांच्या सांगण्यापलीकडे कांहीं पुरावा नाही. दुसरी गोष्ट मात्र अनुमानाने खरी धरतां येण्याजोगी आहे. शाहूने मरते वेळी पेशव्यास मुख्याधिकाराची सनद दिली ती तुळाजी आंग्रे मानीनासा होऊन त्यानें पेशव्याशी बिघाड केला; तो आरमाराच्या व किल्लेकोटांच्या भरावर पेशव्यास कस्पटाप्रमाणें लेखीत असे; सबब पेशव्याने पांच चार वर्षे उद्योग करून अखेरीस मुंबईकर इंग्रजांच्या मदतीने त्याचें राज्य घेतले व त्यास सहकुटुंब कारागृहांत घातलें. पण यांत बहुतेक लोकांना माहीत नाही. अशी गोष्ट ही आहे की, तुळाजी आंग्रे हा चित्तपावनांचा कट्टर द्वेष्टा असून तो त्यांचा फार छळ करू लागला होता. तुळाजीची हृद्द बागलकोटापासून विजयदुगापर्यंत होती व हा टापू तर चितपावनांचें माहेरघर होय. पेठे, फडके, परचुरे, रास्ते, भावे, देशमुख, घोरपडे, जोशी, बारामतीकर जोशी, सोलापूरकर जोशी, बर्वे पटवथंन, मेहेदळे, भानू, लागू इत्यादि पेशवाईतील दरबारी व सरदारी लोकांची मूळ घराणी याच टापूंमधली आहेत. आपल्या अधिकारास न जुमानणार्‍्या प्रतिनिधीला आणि दमानी गायकवाडाला पेशव्यानें त्यांचे सरेजाम खालसा न करितां सोडून दिले आणि तुळाजीचा मात्र समूळ उच्छेद केला, यावरून पेशव्यांच्या वर्तनाला जात्यभिभानाची कांही तरी प्रेरणा असावी असे अनुमान करणें अन्यायाचें होणार नाही. हा चितपावनांचा द्वेष तुळाजीच्या मृत्यूबरोबरच शांत झाला. पेशवाईत पुढे कोणी तुळाजीचा संप्रदाय चालवणारा सत्पुरुष उत्पन्न झाला नाही. हक्काच्या काळांत मात्र कोणी देशी- विदेशी लोकांच्या अंगात तुळाजीचा समंध संचरत असल्याचा केव्हां केव्हां भास होतो.

Hits: 515
X

Right Click

No right click