सांगलीचे संततिलक कै. हणमंतरावजी कोटणीस यांचे चरित्र, लेखक - साधुदास, इ. स. १९३७
कै. हणमंतरावजींच्यासारख्या साधूंच्या आचरणात आढळून येणारा एकसारखेपणा हा निर्जीव वस्तूच्या स्वरूपासारखा एक ठशाचा दिसला, तरी तो त्याहून अत्यंत भिन्न स्वरूपाचा व म्हणून विचारार्ह आहे. मृत मनुष्याची शांतता व प्रतिक्रिया करण्याचे सामर्थ्य अंगी असता शांति धरणाऱ्या मनुष्याची शांतता यातील फरकाप्रमाणेच तो फरक आहे. प्रतिक्रियेचे सामर्थ्य असता शांति धरणाऱ्या मनुष्याची शांतता ही त्याचे आध्यात्मिक सामर्थ्य दर्शविते. तसेच चंचल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्रे चित्त वेगवेगळया क्रिया करण्यास लोटित असता पोटाचा व्यवसाय व सभोतालची मंडळी बहुरंगाची असताना आपला अध्यात्मरंग अखंड कायम ठेवून एकसारखे अखंड साधनानुष्ठान दोन दोन तपे करणे हा एकसारखेपणा उपेक्षणीय नव्हे तर मोठा चिन्त्य आहे. विषयरंग उडविण्याचे सामर्थ्य असता हा मनुष्य मोठ्या आनंदाने एकच गोष्ट करीत बसत आहे, याला एवढा विनामूल्य मिळणारा सुखाचा ठेवा कोणचा मिळाला आहे याचा विचार करणे अत्यंत जरूर आहे.