मनाचे श्लोक ६१-७०

Parent Category: मराठी संस्कृती

उभा कल्पवृक्षातळी दु:ख वाहे ।
तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥

जनी सज्जनी वाद हा वाढवावा ।
पुढे मागुता शोक जीवी धरावा ॥६१॥

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला ।
बळे अंतरी शोक संताप ठेला ॥

सुखानंद आनंद भेदे बुडाला ।
मनी निश्चयो सर्व खेदे उडाला ॥६२॥

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।
हरीबोध सांडूनि वेवाद लागे ॥

करी सार चिंतामणी कांचखंडे ।
तया मागता देत आहे उदंडे ॥६३॥

अती मूढ त्या दृढ बुध्दी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना ॥

अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥६४॥

नको दैन्यवाणे जिणे भक्तीऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे ॥

धरी रे मना आदरे प्रीति रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ॥६५॥

नव्हे सार संसार हा घोर आहे ।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥

जनी वीष खाता पुढे सूख कैंचे ।
करी रे मना ध्यान या राघवाचे ॥६६॥

घनश्याम हा राम लावण्यरुपी ।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥

करी संकटी सेवकाचा कुढावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६७॥

बळे आगळा राम कोदंडधारी ।
महा काळ विक्राळ तोही थरारी ॥

पुढे मानवा किंकरा कोण केवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६८॥

सुखानंदकारी निवारी भयाते ।
जनी भक्तीभावे भजावे तयाते ॥

विवेके त्यजावा अनाचार हेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥६९॥

सदा रामनामे वदा पूर्णकामे ।
कदा बाधिजेना पदा नित्यनेमे ॥

मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत

X

Right Click

No right click