मनाचे श्लोक ३१-४०

Parent Category: मराठी संस्कृती

महासंकटी सोडिला देव जेणे ।
प्रतापे बळे आगळा सर्व गूणे ॥

जयांते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३१॥

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली ।
पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥

जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३२॥

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा ।
शशी सूर्य तारांगणे मेघमाळा ॥

चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३३॥

उपेक्षा कदा रामरूपी असेना ।
जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥
शिरी भार वाहेन बोले पुराणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३४॥

असे हो जया अंतरी भाव जैसा ।
वसे हो तया अंतरी देव तैसा ॥

अनन्यासि रक्षीतसे चापपाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३५॥

सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥

सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३६॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामी तैसा ॥

हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी ।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३७॥

मना प्रार्थना तूजला एक आहे ।
रघूराजअंकीत होऊनि राहे ॥

अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥३८॥

जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगे समाधान बाणे ॥

तयालागि हे सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥३९॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे ।
अती आदरे ठेविजे लक्ष्य तेथे ॥

विवेके कुडी कल्पना पालटीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥४०॥

X

Right Click

No right click